१.आदि शंकराचार्य

आदि शंकराचार्यजयंती – केरळ च्या कालडी गावातून सात वर्षाचा एक तेजस्वी बालक संन्यास घेवून निघाला…. जन्मजात दैवीगुणांमुळे सहाव्या वर्षीच त्याला चारही वेदांचे ज्ञान झालेले होते.
निघतांना विधवा आईला आश्वासन दिले होते की तिच्या निर्वाणाच्या वेळी नक्की हजर राहिल व अंत्येष्टि ही मीच करील. तरीही आईने एकवेळ पुनर्विचार करायला लावला तर म्हणाला की त्याने आत्मोद्धारासाठी नव्हे तर जगदोद्धारासाठी संन्यास घेतला आहे!
त्याकाळी भारतातील समाज जीवनात आत्मग्लानीने पाखंडमत वृद्धींगत होत वेदांचे महत्त्व कमी होत असतांना वर्णाश्रम संस्कृतीचे पुनरुत्थान करून समाजाला व पर्यायाने राष्ट्राला एकसुत्रात त्याला गुंफायचे होते…. माणसाचा जीवनविकास जीव ते ब्रह्म असा आहे हा अद्वैत सिद्धांत मांडायला त्याचा जन्म झालेला होता.
भारताच्या दक्षिणेकडून त्याची उत्तरेकडे यात्रा सुरू झाली. गावा गावांमध्ये आपले अद्वैत तत्त्वज्ञान जागवत गंगाकिनारी तपःश्चर्येला तो निघाला. या प्रवासात हाती दंड, कमंडलू व काखेला झोळी येवढेच सोबत घेवून तो प्रखर बुद्धीमत्तेचा दैवी बालक निघाला. त्याकाळात धरणे नव्हती त्यामुळे नद्या किमान दहा महिने तरी तट भरभरून वाहात. त्यांना पोहून पार करत व वाटेत आडव्या येणाऱ्या डोंगर कड्यांना एखाद्या तरबेज गिर्यारोहकाप्रमाणे पादाक्रांत करत हा नर्मदा किनारी पोहचला. हा बालक निघाला होता गंगा किनारी, पण तपःस्थलीच्या सर्व खाणाखुणा त्याला नर्मदा किनारीच दिसल्यात…. मन म्हणत होते नर्मदा पार करून गंगेकडे जायचे आहे, पण अंतर्मन सांगत होते की नर्मदाकिनारीच त्याला त्याते ईप्सित साध्य होणार आहे.
तो नर्मदा किनारीच राहिला. अखंड परिभ्रमण हाच संन्याशाचा आचार असल्याने तो नर्मदाकिनारी तपश्चर्यारत फिरू लागला.
डोंगरांमधून नर्मदा काठाकाठाने फिरतांना त्याला एक गुहा दिसली. तपःश्चर्येला ही गुहा उत्तम समजून तो गुहेच्या दाराशी गेला व त्याची चाहूल लागून गुहेतून आवाज आला….
कोण आहेऽरे तिकडे….
मी शंकर…. कालडीवरून आलो…. ऐरवी हा परिचय पुरेसा होता….
पण विचारणाऱ्याच्या प्रश्नातील व्याप्ती शंकरला कळलेली होती.
शंकर हे देहाचे नाव होते, पण विचारणारा व सांगणारा दोघंही व्यापकतेच्या अवकाशात विहरणारे विहग होते. त्यामुळे संकुचित देहावस्था दोघांनाही मान्य नव्हती. संकुचित वर्णन दोघांनाही मान्य नव्हते.
आतून प्रश्न करणारे होते आचार्य गोविंदपाद! अनेक वर्ष ते त्या गुहेतच तपःश्चर्यारत होते.
बाहेर होता भरतभूचे वेदपुरक उत्थान करायला सर्वस्वाचा त्याग करून निघालेला आठ वर्षांचा शंकर….
गोविंदपादांनी आवाज दिला व बालक शंकराने अद्वैताचा झरा मोकळा करवून त्याचा प्रवाह सुरू करवला…..
मनो बुद्ध्यहंकार चित्तानि नाहं
न च श्रोत्र जिव्हे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानन्द रूपः शिवोsहम् शिवोsहम् ॥१॥
न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुः न वा सप्तधातुः न वा पंचकोशः।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु चिदानन्द रूपः शिवोsहम् शिवोsहम् ॥२॥
न मे व्देषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः।
न धर्मो न चार्थो न कामो ना मोक्षः चिदानन्द रूपः शिवोsहम् शिवोsहम् ॥३॥
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञ ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्द रूपः शिवोsहम् शिवोsहम् ॥४॥
न मे मृत्युशंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्द रूपः शिवोsहम् शिवोsहम् ॥५॥
अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणीम् ।
सदा मे समत्वं न बंध्योर्नमुक्ती चिदानन्द रूपः शिवोsहम् शिवोsहम्॥६॥
मी मन, बुद्धी, अहंकार व चित्तही नाही,
मी कान, जिभ, नाक व डोळे युक्त शरीरही नाही,
मी आकाश, भुमी, तेज, वायू हे पंचमहाभूतही नाही,
परमआनंदरूप असा मी शिव आहे…..
भारतीय अद्वैत तत्त्वज्ञानाचे संपुर्ण सार या बालकाने आपल्या होणाऱ्या गुरूंसमोर अर्पण केले होते.
हा बालक पुढे आचार्य शंकर वा आद्य शंकराचार्य म्हणून प्रसिद्धी पावला. हे स्तोत्र आत्म षटक वा निर्वाण षटक नावाने अजरामर झाले आहे.
शंकराचार्यांनी आपल्या ३२ वर्षांच्या आयुष्यात अखंड भारताची तीनवेळा परिक्रमा केली.
जागोजागी वेद मत मांडतांना नवनविन रचना करुन भारतीय वेदांतांवर आधुनिक भाष्य करून अजरामर साहित्याची रचना केली.
वेदांवर इतके प्रभावी भाष्य करणारे शंकराचार्य हे कलियुगातील व्यास मुनीच आहेत. शंकराचार्यांचे वेदांवरील भाष्य, ब्रह्मसुत्रादी प्रस्थानत्रयीं वरील भाष्य तसेच त्यांनी प्रसंगोपात्त केलेल्या स्तोत्रादी रचना, तत्त्वज्ञान व व्याकरणाने परिपुर्ण असल्याने कालातीत आहेत.
आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने त्यांनी वेदमत प्रस्थापित करतांनाच भारताच्या चारही दिशांना चार प्रमुख मठांची स्थापना केली व भारताच्या एकात्मतेला सुत्रबद्ध करायला उत्तरेतील मठाचे पुजारी दक्षिण भारतीय तर दक्षिणेतल्या मठाचे पुजारी उत्तरभारतीय ठेवलेत. तसेच पुर्व व पश्चिमेच्या मठांचेही केले.
चारही वेदांचे संरक्षण व संवर्धन करायला या मठांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे वेद वाटून दिलेत.
देवाची सगुण उपासना कशी करावी याविषयी सामान्य माणसाला पंचायतन पुजेचे महत्त्व सांगितले.
आज हिन्दू धर्माचे जे रुप आहे ते शंकराचार्यांनीच टिकवून व वृद्धिंगत केलेले रूप आहे.
हीनते पासून दूर नेवून भारताची हिन्दू ही खरी ओळख शंकराचार्यांनीच निर्माण केली.
आज वैशाख शुद्ध पंचमी, श्रीमद्आद्यशंकराचार्यांची जयंती, हिन्दुधर्माची पुनर्रचना करणाऱ्या या विश्वकर्म्याला शतवार प्रणाम!
(वयाच्या ३२ व्या वर्षी श्रीशंकराचार्यांनी सदेह कैलासगमन केले आहे.)
श्रीशंकरो विजयते!
जय जय शंकर! हर हर शंकर!
वॉट्सॅपवरून साभार दि. ०८-०५-२०२२
श्रीशंकराचार्य स्तोत्र
द्वैतज्ञानतमः प्रभिन्नमभवद्यस्योदयाद्भूतले
वेदान्तामृतवर्षणाय निरताः वन्द्या यदीया कराः।
संव्याप्तो यदुपज्ञमेव महितो ज्ञानप्रकाशो भुवि
श्रीमच्छङ्करदेशिकेन्द्ररवये तस्मै नमो भास्वते।।
धन्या त्वं पृथिवि त्रिलोकगुरुणा कारुण्यमूर्त्या पुरा
पादाम्भोजरजःकणैः सुमहितैः सम्पाविता राजसे।
धन्यः त्वं श्रुतिशीर्षवृन्द महता भाष्यामृतेनैधसे
तत्पादाम्बुजसेवनोत्कमनसो धन्याः वयं शाङ्कराः।।
केचित् शम्भुमुमापतिं श्रुतिगिरां तत्त्वं परं मन्वते
लोकत्राणपरायणञ्च कतिचित् नारायणं मन्वते।
श्रीचक्राञ्चितबिन्दुमध्यवसतिं केचिज्जगन्मातरम्
तत्त्वं तत् गुरुशङ्कराख्यवपुषा विभ्राराजते नोतुलम्।।
येनाकारि समस्तलोकगुरुणा धर्मप्रतिष्ठापनं
यद्भाष्यामृतवर्षणैः श्रुतिशिरःक्षेत्रं समृद्धं महत्।
येनाज्ञानतमो महद्व्यपगतं लोकैकदीपत्विषा
सोयं शङ्करदेशिको भवतु नः वन्द्यं परं दैवतम्।।
हित्वा राजतपर्वतं परशिवः सन्त्रातुकामो नतान्
श्रीमच्छङ्करदेशिकेन्द्रवपुषा सञ्जात इत्यादरात्।
धीमन्तः कथयन्ति किन्तु विनतैः तत्पादसेवार्थिभिः
आविर्भाव इहेर्यते भवहरात् शुद्धात्परब्रह्मणः।।
धर्मेण प्रतिपालितो गुरुगुरोः यस्यावतारोत्सवः
वेदैश्च स्वशिरोभिरादृतमलं यद्भाष्यमत्यद्भुतम्।
यत्स्पर्शाद्भुवि देवताः पुनरगुः चैतन्यवत्त्वं पुरा
सोयं शङ्करदेशिको विजयते मोक्षैकदीपाङ्कुरः।।
*****
शुक्रवार दि.०६ मे, २०२२. आज आद्य शंकराचार्य यांची जयंती! हिंदु धर्माचा -हास होत असण्याचा काळात सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या हिंदुधर्माला नवसंजीवनी दिली. चार दिशांना चार आश्रम स्थापून सारा आर्यावर्त (भारत) हिंदुधर्माच्या सूत्रांनी एकत्र गुंफण्याचे अद्वितीय कार्य केले! गणपती, सूर्य, विष्णू, देवी भगवती आणि भगवान शंकर या दैवतांची (एकत्रित अशी) पंचायतन पूजा रूढ करून विविध देवभक्तांना एकत्र आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. अवघ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात फार मोठे धर्मकार्य केलेल्या, असंख्य संस्कृत स्तोत्रे रचणा-या या आद्य शंकराचार्यांना, (ज्यांचा गौरव शंकरं लोकशंकरम् असा केला जातो!) विनम्र वंदन! आपणां सर्वांना आद्य शंकराचार्य जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
जगद्गुरु शंकराचार्याबद्दल पु.ल.
“काश्मीरच्या प्रवासी-मंदिरात आम्ही तळ ठोकला. ह्या टूरिस्ट सेंटरच्या उशालगतच एक उंच टेकडी आहे आणि टेकडीवर श्रीशंकराचार्यांचे मंदिर आहे. महिन्यापूर्वीच मी केरळातल्या आद्य श्रीशंकराचार्यांच्या कालडी गावी गेलो होतो. आणि आता भारताच्या उत्तर टोकाला ह्या दक्षिण टोकातल्या महापुरुषाने ज्या डोंगरमाथ्यावर बसून शंकराची उपासना केली ते मंदिर पाहत होतो. कुठे केरळातल्या पेरियार नदीच्या तीरावरचे ते कालडी गाव आणि कुठे काश्मिरातले श्रीनगर! कसल्या दुर्दम्य जिद्दीने भारलेली ही माणसे होती ! आम्ही विमानाच्या तीन तासांच्या प्रवासाला वैतागलो होतो आणि हा केवळ वयाच्या आठव्या वर्षी चतुर्वेदी झालेला आईबापावेगळा नंबुद्री ब्राह्मणाचा पोर मरत्या हिंदुधर्माला संजीवनी देण्यासाठी हजारो मैलांची वाट तुडवत, अरण्ये ओलांडत, पर्वत चढत उतरत कैलासराण्याच्या दर्शनासाठी केरळातून काश्मीरपर्यंत आला होता. काश्मिरात मला सर्वांत जर काही सुंदर वाटले असेल तर ते डोंगरमाथ्यावरचे आद्य श्रीशंकराचार्यांचे मंदिर ! गौरीशंकराहूनही जर उंच काही असेल तर ती त्या नंबुद्री ब्राह्मणाची विजिगीषा ! अद्वैताची ध्वजा घेऊन हा प्रखर बुद्धिमत्तेचा ब्राह्मण, पेरियार नदीचे ते पवित्र तीर सोडून जो निघाला तो पाखंड्यांना चेपत चेपत थेट काश्मिरापर्यंत आला. ज्ञानदेवांसारखीच काहीशी त्याचीही कथा. पतीनिधनोत्तर काही महिन्यांनी त्याची माता प्रसवली. गावातली गढूळ तोंडे गलिच्छ बोलली. आठव्या वर्षी वेद म्हणणाऱ्या पोराला डोक्यावर घेऊन नाचावे तिथे त्याला वाळीत टाकला. वास्तविक अशा मुलात किती कडवटपणा यायला हवा ! ज्ञानेश्वरात किती कडवटपणा यायला हवा ! ….
पण शंकराचार्य काय, ज्ञानेश्वर काय-हे धर्मसंस्थापनेचे नर. त्यांनी हिंदुधर्मावर साठलेले शेवाळ दूर करून सनातन आणि निर्मळ विचारांचे पाट देशभर सोडले.”
- पु.ल. देशपांडे.
(अद्वैत वेदान्ताची पाळेमुळे खोलवर रुजवणाऱ्या, खऱ्या अर्थाने “जगद्गुरु” असलेल्या आदि शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने.) . . . . वॉट्सॅपवरून साभार दि.८-०५-२०२२
*************************
२. द्वैत अद्वैत वगैरे
माझे इंजिनियरिंग कॉलेजमधले मित्र श्री.श्यामसुंदर केळकर यांनी निरनिराळे धर्म, तत्वज्ञान वगैरेंचा थोडा अभ्यास केला आहे आणि तो चालू आहे. द्वैत- अद्वैत हे शब्द बहुतेक लोकांच्या वाचनात निश्चितच आले असतील, पण आपल्या नेहमीच्या बोलण्यात ते सहसा कधी येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल थोडे गूढ वाटत असेल. फेसबुकवरील श्री.केळकर यांच्या भिंतीवर त्यांनी अलीकडे या विषयावर एक स्फुटलेखांची लहानशी मालिका दिली होती. ती मी जशीच्या तशी या पानावर उद्धृत केली आहे. यात द्वैत आणि अद्वैत म्हणजे काय याचा सविस्तर उहापोह केलेला नाही, पण त्यांच्याशी संबंधित असलेली आणि आपल्याला माहीत नसलेली अशी बरीच माहिती दिली आहे. ती उद्बोधक आहे. यातले तर्क आणि मते ही पूर्णपणे त्यांचीच आहेत आणि वाचकाने त्यांच्याशी सहमत व्हावेच असे त्यांचे म्हणणेही नाही. या लेखमालेमुळे त्यावर स्वतंत्रपणे विचार करायला चालना मात्र मिळेल. . . . . आनंद घारे
अद्वैत – द्वैत वगैरे -१
तत्त्वम् असि l
शंकराचार्य हे अद्वैत संप्रदायाचे जनक मानले जातात याचे प्रथम सूत्र आहे :-
तत्त्वम् असि l
संस्कृतची गम्मत बघा –
याच वाक्यातून अद्वैतवादी आणि द्वैत वादी दोघे आपली बाजू मांडतात .
तत्त्वम् असि म्हणजे तत् त्वम् असि l
ते तू आहेस . ( अद्वैत वादी )
इथे तत्त्वम् हा संधी मानला गेला आहे .
तत्त्वम् असि म्हणजे तस्य त्वम् असि l
म्हणजे त्याचा तू आहेस . ( द्वैत वादी )
म्हणजे इथे तत्त्वम् हा शब्द समास समजून त्याचा विग्रह केला आहे .
म्हणून ज्ञानी पुरुषांजवळ बसून शिकलेले ज्ञान ते खरे ज्ञान .( First generation knowledge )
********
अद्वैत – द्वैत वगैरे – २
महावाक्ये
महावाक्ये ४ मानली जातात :-
१) प्रज्ञानं ब्रह्म – ऐतरेयोपनिषद ( ऋग्वेद )
२) अहम् ब्रह्माsअस्मि – बृहदारण्यक उपनिषद (यजुर्वेद )
३) तत्त्वम् असि – छांदोग्योपनिषद् ( सामवेद )
४) अयमात्मा ब्रह्म – मांडूक्य उपनिषद ( अथर्ववेद)
उपनिषदांचा काळ किमान इसवीसन पूर्व १००० ते इसवीसन पूर्व ३००० असा मानला जातो . ( किवा त्याही पूर्वी )
प्रज्ञानम् ब्रह्म याचा अर्थ प्रगट ज्ञान म्हणजेच ब्रह्म . म्हणजेच जिवंत ज्ञानी पुरुष म्हणजे ब्रह्म .
अहम् ब्रह्माSस्मि म्हणजे मीच ब्रह्म आहे .
तत्त्वम् असि म्हणजे ते ( ब्रह्म ) तूच आहेस .
अयमात्मा ब्रह्म म्हणजे हा आत्माच ब्रह्म आहे .
ह्या चारही वाक्यांचा एकत्रित अर्थ काय निघतो ?
मी म्हणजे आत्मा आहे – ज्ञान प्राप्तीनंतर ब्रह्म आहे . ( म्हणजेच परमात्मा आहे . ब्रह्मालाच कोणी परमात्मा म्हणतात .)
ही चारही वाक्ये अद्वैत निदर्शक आहेत . म्हणजे अद्वैत सिद्धांत फार पूर्वी पासून प्रचलित आहे .
मग शंकराचार्य याना महत्त्व का ?
पण यात ” वासांसि जीर्णानि यथा विहाय ” अशा पुनर्जन्मनिर्देशक किवा ” नैनम् छिंदति शस्त्राणि ” अशा आत्म्याच्या अविनाशीपणाचे निर्देशक वाक्यांचा उल्लेख का नाही ?
विशिष्टाद्वैत , द्वैताद्वैत आणि द्वैत सिद्धांत का आले ?
*******
अद्वैत – द्वैत वगैरे – 3
प्रज्ञानं ब्रह्म – ऐतरेयोपनिषद ( ऋग्वेद )
प्रज्ञानम् ब्रह्म याचा अर्थ प्रगट ज्ञान म्हणजेच ब्रह्म . म्हणजेच जिवंत ज्ञानी पुरुष म्हणजे ब्रह्म .
आत्मज्ञान प्राप्त झालेल्या अनेक व्यक्ती असतात . त्याना झालेले ज्ञान एकच असते का ? रजनीश , दादा भगवान , सरश्री सगळे जण म्हणतात की ते एकच असते .
हे भौतिक विज्ञान नाही . भौतिक विज्ञान सतत बदलत असते . काही नवीन गोष्टी कळतात . काही जुन्या गोष्टी चुकीच्या किवा अपुऱ्या असतात . त्यात सुधारणा करावी लागते . पण आत्मज्ञानाचे तसे नाही . सगळ्यांना एकच ज्ञान प्राप्त होते म्हणून आपण – प्रज्ञानम् ब्रह्म – असे म्हणू शकतो . ते ज्ञान जर वेगवेगळे असते तर ब्रह्म पण वेगवेगळे झाले असते .
मग अनेक पंथ का ? भगवान महावीर तीर्थंकर आणि गौतम बुद्ध तीर्थंकर का नाहीत ?
जैन मतानुसार तीर्थंकराना पुन्हा जन्म नसतो त्यांच्या सर्व आशा , अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण झालेल्या असतात , पाप – पुण्य / Debit – Credit दोन्ही खात्यात शिल्लक शून्य असते आणि त्यांच्या मृत्यूनंतर ते सिद्ध क्षेत्रात जातात .
रजनीश यांच्या मते अनेक जण आत्मज्ञान प्राप्तीनंतर थेट मोक्षात जातात . पण ते तीर्थंकर नाहीत . ते सिद्ध आहेत .
तीर्थंकर व्यक्तींच्या केवळ दर्शनाने मोक्षगती मिळते . ( अर्थात तशाच पुण्यवान व्यक्तीना तो योग लाभतो .) पण या व्यक्ती लगेचच देहत्याग करून मोक्षास जातात . म्हणून ते तीर्थंकर नाहीत .
गौतम बुद्धांचा एक जन्म बाकी आहे असे काही पुस्तके सांगतात . आपले ज्ञान दुसऱ्याना मिळावे अशी त्यांची करुणा शिल्लक होती . म्हणून २५०० वर्षानी मी परत येईन असे त्यांचे वचन आहे असे म्हणतात . म्हणून ते तीर्थंकर नाहीत . ( सौजन्य – साध्वी – वैभवश्री , यू ट्यूब – चरम मंगल )
मग एवढे पंथ आणि संप्रदाय का ?
आत्म्याबद्दल मांडूक्योपनिषद् काय सांगते ?
हा अंत : प्रज्ञ नाही , बहि : प्रज्ञ नाही , उभयत:प्रज्ञ नाही
प्रज्ञानघन नाही ,प्रज्ञ नाही , अ- प्रज्ञ नाही .
अदृश्य , अव्यवहार्य ( ज्याचे भाग पडत नाहीत ), अग्राह्य , लक्षणरहित , अचिंत्य आहे , शब्दाने समजावण्यासारखा नाही . एकच एक आत्म्याचा अनुभव हे त्याचे सार आहे . तो शांत , शिव , अद्वैत आहे .
( सौजन्य – अष्टादशी – विनोबा )
*********
अद्वैत – द्वैत वगैरे – ४
प्रज्ञानं ब्रह्म – ऐतरेयोपनिषद ( ऋग्वेद ) -२
मग एवढे पंथ आणि संप्रदाय का ?
ज्ञान एकच असले तरी त्याची अभिव्यक्ती अशक्य असते
हे आपण कालच पाहिले . ( वर्धमान महावीर यांची देशना मौन असे असे एक पंथ मानतो .)
तरी पण तीर्थंकरपदापासून फक्त किंचित दूर असलेल्या व्यक्तीना हे ज्ञान अजून काही जणाना मिळावे असे वाटते .
पण त्या ज्ञानाची अभिव्यक्ती समोर कोण आहे त्यावर अवलंबून असते . ती अभिव्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे असते . एकाच प्रश्नाचे उत्तर अशी व्यक्ती वेगवेगळ्या लोकाना वेगवेगळी देऊ शकते .
मुळात हा अनुभव स्वत:ला स्वत :च घ्यायचा आहे . ज्ञानी व्यक्ती फक्त सहायक – Catalyst बनू शकते . त्यासाठी आदर्श परिस्थितीत एकास एक असाच संपर्क हवा .
ज्ञानी व्यक्ती अतिशय दुर्मिळ असतात . आपले पुण्य त्याना ओळखण्यात कमी पडते . ओळखले तरी विविध प्रकारच्या अंतरायान्मुळे आपण त्यांच्याशी संपर्क करू शकत नाही . ज्ञानी व्यक्ती वेगवेगळ्या देशात प्रगट होतात . ते मुळात कमी बोलतात . त्यांच्या भाषेत बोलतात . ते कोणाशी तरी बोलतात आणि मग त्यांच्या बोलण्याची पुस्तके छापली जातात .
दादा भगवान म्हणतात :- एक वैद्य एका रोग्याला केळे खाणे बंद करा असे सांगतो . दुसरा रोगी केळे खाणे बंद करतो . अरे, तुला थोडेच वैद्यानी तसे सांगितले आहे ?
पुस्तक छापले की असे होते .
रजनीश लिहितात . एक माणूस काश्मीरला जातो . त्याला ती हवा आवडते . मग तो आपल्या मुंबईतील प्रेयसीला एक पेटी पाठवितो आणि लिहितो :- तुझ्यासाठी काश्मीरची हवा पाठविली आहे . काय होईल त्या हवेचे ? ज्ञान असे पेटीत / पुस्तकात बंद करता येत नाही .
एखाद्या मुलाने मेणबत्तीवर हात ठेवला तर त्याला आगीचा अनुभव येतो. त्यापूर्वी तो ऐकतो का ? नाही मग मात्र आयुष्यभर विसरत नाही . .
आत्म्याचा अनुभव आला की खूप आनंद होतो .
त्या आनंदाची मीमांसा तैत्तिरीय उपनिषदांत केली आहे . त्यासंबंधी पुढील भागात .
*********
अद्वैत – द्वैत वगैरे – ५
प्रज्ञानं ब्रह्म – ऐतरेयोपनिषद ( ऋग्वेद ) -३
आत्म्याचा अनुभव आला की खूप आनंद होतो .
त्या आनंदाची मीमांसा तैत्तिरीय उपनिषदांत अशी केली आहे .
ही आनंदाची मीमांसा आहे . युवक असावे युवक सत्चरित्र, अध्ययनसंपन्न ,अत्यंत आशावान , दृढ- निश्चयी ,बलिष्ठ असावा . त्याच्यासाठी ही सर्व पृथ्वी वित्ताने पूर्ण असावी हा जो आनंद तो एक मनुष्य – आनंद .
असे जे १०० मनुष्य – आनंद तो मनुष्य – गंधर्वांचा १ आनंद आहे .
असे मनुष्य – गंधर्वांचे १०० आनंद = देव गंधर्वांचा १ आनंद
असे देव – गंधर्वांचे १०० आनंद= नित्यलोकात रहाणाऱ्या पितरांचा १ आनंद
असे नित्यलोकात रहाणाऱ्या लोकांचे १०० आनंद = जन्मजात देवांचा १ आनंद
जन्मजात देवांचे १०० आनंद = कर्म करून देवत्व पावलेल्या कर्मदेवांचा १ आनंद
कर्मदेवांचे असे १०० आनंद = देवांचा १ आनंद
देवांचे १०० आनंद = इंद्राचा १ आनंद
इंद्राचे १०० आनंद =बृहस्पतीचा १ आनंद
बृहस्पतीचे १०० आनंद = प्रजापतीचा १ आनंद
प्रजापतीचे १०० आनंद = ब्रह्माचा १ आनंद
बालिश वाटते ना ? पण आपण ज्याला परमोच्च सुख मानू , त्याच्या 10 raised to 20 इतके पट म्हणजे
१० लाख कोटी कोटी / १०० मिलियन ट्रिलियन पट हा आनंद आहे .
म्हणजेच सत्- चित् – आनंदाची आपण कल्पनाच करू शकत नाही .
********
अद्वैत – द्वैत वगैरे – ६
गीता म्हणजे वेद आणि उपनिषदांचे सार असे बोलले जाते . याचा अर्थ असा होतो की वेद आणि उपनिषदे यांची रचना श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधी आहे . महाभारताच्या आधी पासून आहे .
मग व्यासानी वेद लिहिले म्हणजे काय ? महाभारतातील युद्ध हे दुसऱ्या महायुद्धाशी तुलना करण्यायोग्य किवा त्याहूनही मोठे होते . प्रचंड मनुष्यहानी , वित्तहानी आणि नासधूस झाली . त्यात वेद आणि उपनिषदेही नष्ट झाली .काही संशोधकांचे मत असे आहे की व्यासानी सर्व वेद आणि उपनिषदे यांच्या उपलब्ध प्रती मिळवून त्यातून पुन्हा वेद आणि उपनिषदे यांच्या संहिता निश्चित केल्या . ( एकनाथ महाराज यानी जशी ज्ञानेश्वरी ची एक प्रमाण प्रत तयार केली त्याप्रमाणे )
संजय सोनवणी यांचे एक पुस्तक आहे – हिंदू धर्माचे शैव रहस्य . त्यांच्या मते आपला मूळ धर्म – पंथ हा शैव आहे . ७० % मंदिरे शंकराची आहेत . अमरनाथ , केदारनाथ , बारा ज्योतिर्लिंगे अशी अनेक जुनी प्राचीन मंदिरे ही शंकराची आहेत . शैव पंथ हा अद्वैत वादी आहे . म्हणून सर्व भारतभर अद्वैत पंथाचेच प्राबल्य होते . ( खुद्द श्रीराम यानी लंकेवर स्वारी करण्यापूर्वी शंकराचीच पूजा केली होती .)
वैदिक पंथाच्या इतकाच किवा कदाचित त्याहूनही अधिक जुना जैन पंथ आहे . जैनांचे २२ वे तीर्थंकर हे श्रीकृष्ण यांचे सख्खे चुलत भाऊ . महाभारतातील प्रचंड हिंसेनंतर जनतेमध्ये युद्धाविरुद्ध मोठे जनमत तयार झाले असावे .यामुळे पुढील काही काळात वैदिक पंथाची खूपच पीछेहाट झाली असावी . २३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे काळात जैन पंथ वाढला . त्यानंतर सुमारे ३०० वर्षानी २४ वे तीर्थंकर महावीर आणि गौतम बुद्ध यांचाही जन्म झाला . बौद्ध पंथीय लोकांची संख्याही वाढू लागली .
अशा या परिस्थितीत आदि शंकराचार्य यानी अद्वैत मताला संपूर्ण भारतभर पुन्हा चेतना दिली. महाभारतीय युद्ध ते शंकराचार्य यात सुमारे ३५०० वर्षाहून जास्त कालावधी आहे . एवढ्या मोठ्या कालखंडानंतर हे घडले . म्हणजे एक प्रकारे त्यानी अद्वैत मताचे पुनरुज्जीवनच केले .
आद्य शंकराचार्य हे शंकराचेच उपासक आहेत . बरेच लोक शिवोs हम् असे म्हणतात . मी शिव आहे असे म्हणतात . म्हणजेच आपला मूळ पंथ शिव आहे.
वैष्णव पंथ खूप नंतर उदयास आला . सुमारे ४०० वर्षानी आला .
********
अद्वैत – द्वैत वगैरे – ७
अद्वैत मताचा घोष फक्त भारतातील लोकानीच केला आहे का ? नाही . सूफी संतानीही केला आहे . शुभ्र पवित्र लोकरीचे वस्त्र म्हणजे सूफ . असे वस्त्र अंगावर घालतात ते सूफी .
मंसूर – अल – हल्लाज ( ८५८-९२२ ) जन्म – इराण , मृत्यू – बगदाद ( इराक ) या नावाचे एक सूफी संत होऊन गेले . त्यानी ” अनल हक ” अशी घोषणा केली होती अनल हक या उर्दू शब्दांचा अर्थ काही जण ” मी सत्य आहे ” (आणि सत्य म्हणजेच परमेश्वर )असा करतात . जावेद अख्तर याचा अर्थ ” अहम् ब्रह्माs स्मि ” असा करतात . इराण आणि इराक हे तेव्हा मुस्लिम धर्मी देश होते आणि आजही आहेत .
त्याचे गुरु जुनैद . ते त्याला म्हणाले – तू हे कृपया मोठ्याने बोलू नकोस . मंसूर त्याना म्हणाला की जेव्हा मी हे अनुभवत असतो तेव्हा माझ्याकडून हे बोललेच जाते . मी ते अडवूच शकत नाही .
त्याला हाल हाल करून मारण्याची शिक्षा झाली . आख्यायिका अशी आहे की हात , पाय कापले जात असतानाही तो हसत होता , म्हणत होता – ज्याला कापता येत नाही , ज्याला जाळता येत नाही , तोडता येत नाही त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहेत हे वेडे लोक ! ( नैनम् छिंदति शस्त्राणि , नैनम् दहति पावक: – आठवा)
सगळ्यांना मंसूर वर दगड फेकण्याची आज्ञा होती . जुनैद नी एक फूल फेकले . मंसूरच्या डोळ्यात अश्रू आले . माझ्या गुरूना माहीत आहे की मी खरे बोलत आहे पण त्यानाही काहीतरी फेकावे लागले .
जे सत्य आहे ते कुठेही प्रगटेलच . मुख्य म्हणजे ते Invention नाही , Discovery आहे आणि शोधायचेही स्वत:मध्येच ! मग त्याला कोण अडवू शकेल ?
सौजन्य – रजनीश
**********
अद्वैत – द्वैत वगैरे – ८
आदि शंकराचार्य यांचा काळ ८ वे शतक असा सापडतो मध्वाचार्य ज्यानी द्वैत मताची मांडणी केली त्यांचा काळ (१२३८- १३१७ ) आहे .
ख्रिश्चन धर्माची सुरुवात १ ल्या शतकात झाली आणि इस्लाम धर्माची स्थापना ७ व्या शतकात झाली . ( त्याही पूर्वी ज्यू धर्म ख्रिस्त पूर्व १८ व्या किवा २० शतकापासून अस्तित्त्वात होता ) या तीनही धर्मात भगवान मालिक आणि माणसे ही प्रजा आहेत . सर्व माणसांवर भगवान / अल्ला/ ईश्वर याचे लक्ष असते आणि तो त्या सर्व लोकांच्या पाप – पुण्याचा निवाडा करतो अशी त्यांची श्रद्धा आहे . हे जग देवाने निर्माण केले आहे असे हे तीनही धर्म मानतात .
१०-११ व्या शतकात ख्रिश्चन आणि मुस्लिम यांचा भारतात पुरेसा शिरकाव झाला होता .
अद्वैत मत ” ब्रह्म सत्यम् जगत् मिथ्थ्या ” असे म्हणते . डोळ्यांना उघड उघड दिसणारे जग मिथ्थ्या हे कसे पटणार ? अद्वैत मत प्रतिपादन करणारा एक ब्राह्मण समोरून हत्ती येत आहे असे पाहून तिथून पळून गेला आणि हत्ती गेल्यावर परत आला . त्यासंबंधी विचारले असता त्याचे उत्तर होते :- गजमपि मिथ्थ्या , पलायनमपि मिथ्थ्या l असे शब्दांचे खेळ या नवीन धर्मांच्या आगमनानंतर पटणे कठीण होते .
ब्रह्मज्ञान मिळविणे हे अंतिम लक्ष्य असे अद्वैत मत मानते .
पण जे कधी पाहिले नाही आणि ऐकले नाही ते लोकानी खरे का मानावे ?
ज्याना दोन वेळचे जेवण सहज उपलब्ध आहे , रहाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था आहे , ल्यायला पुरेशी वस्त्रे आहेत अशा सुखवस्तू लोकांसाठी ब्रह्मज्ञान , अद्वैत वगैरे ठीक होते . वेद आणि उपनिषदे ही अशा लोकांसाठी आहेत .
पण बाकी लोकांचे काय ? सामान्य लोकांचे काय ? अद्वैत मताला गोंजारत बसले असते तर पूर्ण भारतभर मुस्लिम किवा ख्रिश्चन धर्म पसरला असता .
म्हणून सर्वसामान्यांना समजेल अशा व्यावहारिक धर्माची मांडणी रचण्यात आली . याची सुरुवात रामानुजाचार्य ( १०१७-११३७ ) यानी केली. त्यानी मायावाद ( फक्त ब्रह्म सत्य आणि जग मिथ्थ्या ही विचारसरणी ) नाकारला .यानी जातीभेद दूर करण्याचा आणि समाजसुधारणा करण्याचा प्रयत्न केला .
मध्वाचार्य यानी द्वैत मताची मांडणी केली . त्यानी पाच प्रमुख भेद मान्य केले .
१) ईश्वर आणि जीव
२) ईश्वर आणि जड
३) जीव आणि जीव
४) जीव आणि जड
५) जड आणि जड
याखेरीज विश्वाची निर्मिती , वाढ आणि विनाश करणारा देव म्हणजे विष्णू असे म्हटले . म्हणजेच हे जग देवाने निर्माण केले असे मान्य केले . अद्वैत मत हे जग नित्य आहे , कोणीही निर्मिलेले नाही असे होते . ( हे सर्व करताना त्यानी – मध्वाचार्य यानी उपनिषदांमधूनच आधार शोधला
भक्तीमार्गाने तुम्ही ईश्वराजवळ जाऊ शकता . ईश्वर बनू शकत नाही . मूर्तीपूजा करून देव प्रसन्न होतो अशा गोष्टी यानंतर सुरू झाल्या . पुराणाना महत्त्व प्राप्त झाले .हे सर्व विचारपूर्वक केले गेले असावे . जग म्हणजे माया नसून सत्य आहे हे या मताने मान्य केले .यामुळे एतद्देशीय आणि मुस्लिम / ख्रिश्चन धर्मातील फरक खूप कमी केला .किवा नवा एतेद्देशीय धर्म स्थापन झाला . ह्या सर्व गोष्टी अद्वैत मतापेक्षा खूप सोप्या आहेत . साध्या आहेत .
यातून वैष्णव पंथाचा पाया घातला गेला आणि भक्ती मार्ग
वाढीस लागला . अंधश्रद्धा वगैरे यातूनच वाढीस लागल्या .
अद्वैत मार्ग आणि द्वैत मार्ग उघड उघड विरोधी दिसत असल्यामुळे शैव आणि वैष्णव यांचे कट्टर वैर होते .इतके की महाशिवरात्रीला शैव उपास करीत तर वैष्णव श्रीखंडपुरी खात असे मी ऐकले आहे !
( या लेखातील मते / तर्क माझे आहेत . चुकीचे असू / वाटू शकतात .)
********
अद्वैत – द्वैत वगैरे – ९ ( समारोप )
पुष्टीमार्ग : वल्लभाचार्य ( १४७९-१५३१) यानी पुष्टीमार्ग सुरू केला त्याकाळी मुस्लिम अम्मल होता . त्यामुळे हिंदू स्त्रिया घराबाहेर पडू शकत नसत . त्यावेळी वल्लभाचार्य यानी काळानुरूप हिंदू धर्माला पुष्टी दिली . घरात बसूनही भक्ती करता येईल असा तो मार्ग होता .
कृष्णजन्म साजरा करणे , कृष्णाचा पाळणा हलविणे , दही – हंडी करणे असे निरुपद्रवी कार्यक्रम त्यानी सुरू केले . बासरीवाल्या कृष्णाची पूजा , राधाकृष्णाची पूजा करणे असले कार्यक्रम त्यानी सुरू केले .
हिंदू धर्म म्हणजे निश्चित असे काहीच नसल्यामुळे , शिक्षणाचा पूर्ण अभाव असल्यामुळे गैर मुस्लिम जनतेला एकत्र ठेवणे आणि कशात तरी गुंतविणे एवढाच याचा हेतू असावा .
माझा हा मार्ग सुमारे ५०० वर्षे चालेल असे ते म्हणाले होते . ५०० वर्षे होऊन गेली आहेत .
***
स्वातंत्र्यानंतर : आता आपण स्वतंत्र देश आहोत . आता आपल्याला अशा शिशु वर्गातील धर्माची आवश्यकता नाही . धर्म दोन प्रकारचे असतात . स्वधर्म ( म्हणजेच आत्मधर्म किवा पारलौकिक धर्म ) आणि परधर्म (म्हणजेच लौकिक धर्म ज्यात सर्व धर्म – हिंदू , मुस्लिम , ख्रिश्चन वगैरे मोडतात .)
स्वधर्म हा नितांत वैयक्तिक धर्म आहे आणि त्याचा इतरांशी काहीही संबंध नाही . त्यात कोणतीही कर्मकांडे नसतात . ज्यांच्या दृष्टीने पारलौकिक असे काही नसते अशांचा या प्रकाराशी काहीही संबंध नाही .
परधर्म ज्याचा त्याचा जसा असेल तसा त्याने / तिने पाळावा . परधर्म पाळताना मात्र भारतीय घटना पाळली जावी . घटना लौकिक धर्मापुरतीच म्हणजे ऐहिक धर्माशीच मर्यादित आहे . परधर्म हा व्यावहारिक धर्म आहे . परस्परांशी वागताना कसे वागावे याचे हा मार्गदर्शन करतो . यासाठी घटना आणि कायदा पाळणे एवढेच पुरेसे आहे .
मुस्लिम अमदानीत आणि ख्रिश्चन अमदानीत आपद् धर्म म्हणून सुरू केल्या गेलेल्या गोष्टी आता टाळायला हव्यात . कृष्णाला दही हंडीत , बासरीत , मोरपिसात किवा राधेत गुंतवून न ठेवता योगेश्वर कृष्णाची आठवण जागवावी . दसऱ्याला रावणवध करण्याची गरज नाही . उलट प्रभू रामचंद्रानी रावणाचे सर्व अंत्यसंस्कार विधी नीट पार पाडले हे आवर्जून लक्षात ठेवावे . हळदी कुंकू , वट – सावित्री , हरतालिका या गोष्टी आता कालबाह्य व्हाव्यत .
Mind**** Inside Cambridge Analytica ‘s plot to break the world
लेखक – ख्रिटोफर वायली
या पुस्तकाची समीक्षा माझे एक फेसबुक मित्र नरेंद्र दामले यानी ” द्वेषाची पेरणी ” या नावाने लोकसत्तात १३-११-२०२१ रोजी केलेली आहे . फेसबुकच्या, WA च्या या जमान्यात आपली मते कलुषित करण्यासाठी, आपली संस्कारमूल्ये बदलवण्यासाठी अनेक प्रकारे आपल्याला बदलवण्यासाठी आपला वापर केला जाऊ शकतो .
कोणाकडूनही धर्माच्या नावावर आपला गैरवापर होऊ देऊ नका . एवढा धर्म आपल्या व्यवहारात ठेवा . समाज- माध्यमे वापरताना हे लक्षात राहू द्या .
काळानुरूप आणखी एक धर्म आपण व्यवहारधर्माशी जोडायला हवा . तो म्हणजे पर्यावरण धर्म . हिंदू धर्म संकटात आहे असे नसून अख्खी मानवजात संकटात आहे .
आपण असेच वागत राहिलो , तर १५०-२०० वर्षानंतर आपण अस्तित्त्वातच असणार नाही . निसर्ग आपले काम करून टाकील . आपण निसर्गाचे पाहुणे असून जर यजमानालाच लुटायला लागलो तर अखेरीस यजमान गप्प रहाणार नाही आणि आपल्याला आपली जागा ( ? ) दाखवून देईल !
गेली २ वर्षे माणूस किती क्षुद्र आहे याची जाणीव आपल्याला करोनाने करून दिलीच आहे . ही फक्त ट्रेलर होती . सिनेमा पहाण्याची वेळ न येवो !
( या लेखातील मते / तर्क माझे आहेत . )
श्याम केळकर
**********
यावर माझे विचार :
‘तत्वमसि’ पासून सुरू करून ‘व्यावहारिक धर्मा’पर्यंत आणलेली ही स्फुटलेखमाला वाचनीय आहे. या लेखांमधली मते आणि तर्क लेखकाचे आहेत आणि अर्थातच ते त्याच्या वाचनावर आधारलेले आहेत. उदाहरणार्थ मी “पुष्टीमार्ग” कधी ऐकलाच नाही. पण तशा प्रकारचा वारकरी पंथही चारपाचशे वर्षे टिकून राहिला आहे आणि जास्त माहितीतला आहे. “ज्याना दोन वेळचे जेवण सहज उपलब्ध आहे , रहाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था आहे , ल्यायला पुरेशी वस्त्रे आहेत अशा सुखवस्तू लोकांसाठी ब्रह्मज्ञान, अद्वैत वगैरे ठीक होते . वेद आणि उपनिषदे ही अशा लोकांसाठी आहेत.” हे निरीक्षण अगदी बरोबर आहे. मानवधर्म आणि पर्यावरणधर्म पाळला गेला तरच मानवजात सुखाने राहू शकेल. हे लेखकाचे मला निष्कर्ष १०० टक्के मान्य आहेत.
हिंदू धर्मीयांमध्ये अनेक समजुती किंवा मतप्रवाह मानणारे पंथ आहेत. त्यात खूप विसंगति दिसते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे परस्पराशी संबंध, त्यांच्यामधील कामांची वाटणी आणि त्यांचे अनेक अवतार, गणपती व देवी वगैरेंची अनेक रूपे किंवा अवतार, त्यांनी केलेले चमत्कार वगैरे, वगैरे, वगैरे. वेद तर अपौरुषेय आहेत, ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने काही निवडक ऋषींना सांगितले. व्यास मुनी तर जन्माला येताच एकदम बारा वर्षाच्या मुलाएवढे झाले आणि त्यांना सगळे वेद आपोआप समजले वगैरे गोष्टी अनाकलनीय आहेत. या सगळ्यावर तर्कसंगत विचार करण्यतच काही अर्थ नाही असे मला वाटते.
हे जग कुणी निर्माण केलं? किंवा ते कसे चालते? अशा गहन प्रश्नांची उत्तरे म्हणून देव ही संकल्पना निर्माण झाली असे म्हणतात. अगतिकतेच्या परिस्थितीत तोच तारणहार आधार असतो. सर्वसामान्य लोकांना दंडवत घालण्यासाठी किंवा नवसाला पावणारा एक देव हवा असतो आणि तो दगडाची किंवा धातूची मूर्ती, अमूर्त आकार, झाड, गाय, नाग, एकादा साधू, बाबा, पीर अशा निरनिराळ्या स्वरूपांमध्ये त्यांना सहजपणे मिळतो. यामुळे देव हा आपल्यापेक्षा वेगळा आहे असेच ९९.९९९९९९९९ टक्के लोक समजत आले आहेत. मनापासून अद्वैत मान्य करणारा मला तरी अजून कोणी भेटलेला नाही. मला काही नास्तिक भेटले आहेत, पण देव आहे असे मानणारे सगळेजण ती अपरंपार सामर्थ्य असलेली एक वेगळी शक्ती आहे असेच समजतात.
. . . . आनंद घारे